Saturday, June 12, 2010

भिगी भिगी ऋत मे...

गाजलेल्या पावसाच्या गाण्यांच्या या आठवणी.

.............

मुसळधार पाऊस कोसळतोय. रस्त्यावर शुकशुकाट. अशा रोमँटिक वातावरणात अमिताभ आणि स्मिता पाटील बेभान झालेत. पांढऱ्या शुभ्र साडीतली, चिंब भिजलेली स्मिता पाटील हातागाडीवर पहुडलीय आणि 'आज रपट जाये तो...' या गाण्यावर ठेका धरत बच्चन हातगाडीला धक्का मारतोय ...'मंझिल' सिनेमातील अमिताभ आणि मौसमी चटजीर्चं 'रिमझिम गिरे सावन' हे गाणंही असंच ओलेतं. पावसातली गाणी आठवायची म्हटली की ही दोन गाणी हटकून नजरेसमोर येणारच...हिंदी सिनेमात ज्याप्रमाणं होळी-दहिहंडीची गाणी अजरामर झालीत, त्याचप्रमाणं पावसातल्या बेधुंद गाण्यांच्या सरीही तनामनाला भिजवतात.

हिंदी सिनेमांमधल्या पावसाच्या अनेक गाण्यांचा ठसा आजही कायम आहे. बाहेर पाऊस कोसळत असताना घरात टी.व्ही.वर ही गाणी लागली की डबल धमाका. 'नमकहलाल' सिनेमातलं आज 'रपट जाये' आणि 'मंझिल'मधलं 'रिमझिम गिरे सावन' या गाण्यांना अजून तरी तोड नाही. भिजून चिंब झालेली, ओली साडी अंगाला घट्ट चिकटलेली, थंडीनं थोडी कुडकुडणारी मधुबाला आणि 'एक लडकी भिगी भागी सी...' असं म्हणत तिच्यावर डोरे टाकणारा किशोर कुमार या दोघांवर चित्रीत झालेलं गाणं तर अप्रतिमच.

मुमताज आणि राजेश खन्नाची पावसातली गाणी तर बोलायची सोय नाही. मुमताजचं मुरडणं एरव्ही पण वेड लावणारंच होत. पावसात भिजल्यानंतर तर ते मुरडणं आणखीनच मादक दिसायचं. 'रोटी' सिनेमातलं या दोघांचं गाणं आठवून तर बघा. काळ्या साडीत पावसात भिजत चेहऱ्यावर विविध विभ्रम दाखवत मुमताजनं ते गाणं हिट केलं होतं. हातवारे आणि मान थोडी तिरकी करत चिकण्या चोपड्या राजेशनेही तिला लाजून चूर व्हायला लागलं होतं. राज कपूरचं प्यार हुआ इकरार हुआ...या गाण्यातलं वातावरण तर अप्रतिम होतं. भरतभूषण आणि माला सिन्हाचं 'जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात', खिडकीत उभं राहून, बाहेर कोसळणारा पाऊस बघत 'ओ सजना... बरखा बहार आयी...' अशी देव आनंदला साद घालणारी साधना, 'बॉम्बे' सिनेमातलं 'तूही रे, तुही रे, तेरे बिना मै कैसे जियू...' ही गाणी खास पावसाळीच.

पावसातल्या गाण्यांमध्ये तरल किंवा स्फोटक असा प्रकार नसतो. ही गाणी कितीही सोबर असली तरी भर पावसात आगडोंब उसळून देणारीच ठरतात. 'मोहरा' सिनेमातील 'टिप टिप बरसा पानी...' या गाण्याच्या ओळी गुणगुणायला सुरूवात तर करा. रविना टंडनचा जाळ समोर येतो. त्या आगीत तेल ओतायला अक्षय कुमार होताच की. हा सिनेमा तर हिट झालाच, शिवाय गाणंही. '१९४२ अ लव्ह स्टोरी' सिनेमातील अनिल कपूर आणि मनिषा कोईरालंचं 'रिमझिम रिमझिम...' हे गाणं सॉलिड रोमँटिक होतं. 'गुरू' सिनेमात 'बरसो रे मेघा मेघा' या गाण्यात ऐश्वर्यानं भरपावसात दिलखेचक अदा दाखवली होती. 'लगी आज सावन की फिर वो झडी है...' या गाण्यात विनोद खन्नाचं रांगडेपण खुललं होतं. 'भीगी भीगी रातो में'...'अब के सावन ऐसे बरसे...', 'हाय हाय ये मजबुरी...' ही पावसाळी गाणी आजही चलनात आहेत. मराठी सिनेमात पावसाची अशी फारशी गाणी नाहीत. 'सर्जा' सिनेमातलं 'चिंब पावसानं रान झालं आबादानी....', 'रिमझिम पावसाची ऐक ना...' अशी काही मोजकीच गाणी पावसात चित्रीत झाली आहेत.

पावसातला खरा आगडोंब कसा असतो हे बघायचं असेल तर थेट दाक्षिणात्य सिनेमात घुसायचं. दोन वर्षांपूवीर् दाक्षिणात्य चॅनेलवर रात्री अकरा वाजल्यानंतर दाखवली जाणारी पावसातली गाणी चोरून बघितली नाहीत, असा माणूस सापडणार नाही. हिंदी सिनेमात किमान एक सीमारेषा तरी असते. पण दाक्षिणात्य सिनेमात पावसाला संकोच वाटेल असा धमाका असतो. पाऊस धो धो कोसळतोय, हिरो-हिरोईन बेभान होऊन नाचतायंत, अशी गाणी या सिनेमांमध्ये खच्चून भरलेली असतात. त्यामुळेच या गाण्यांना दाक्षिणात्य की मराठी अशी सीमारेषा राहिलेली नाही.

टॉप फाइव्ह

रिमझिम गिरे सावन - मंझिल

टिप टिप बरसा पानी - मोहरा

बरसो रे मेघा मेघा - गुरू

आज रपट जाये - नमक हलाल

प्यार हुआ... - श्री ४२०

2 comments: